उत्तम पिंगळे
काल बरेच दिवसांनी प्राध्यापक विसरभोळे सरांना फोन केला. सरसुद्धा म्हणाले की, बरेच दिवस आपला फोन आला नाही, असा विचार करतोय तेवढ्यात तुमचा फोन वाजला, काय टेलिपथी आहे बघा. अर्थात, विषय पुन्हा लॉकडाऊनवर आला. मी सरांना म्हणालो, काय सर, पुन्हा लॉकडाऊन चालू आहे? सर म्हणाले, बरोबर आहे. एकदम सर्व निर्बंध शिथिल करणे शक्य नाही म्हणून हळूहळू आपली गाडी पूर्वपदावर आणावी लागेल. जेथे रुग्ण वाढतील तेथे पुन्हा लॉकडाऊन स्थानिक पातळीवर लागू करणे चालूच राहणार.
मी त्यांना सांगितले की, काहीजणांनी आत्महत्या केली आहे. सर त्यावर म्हणाले की, आत्महत्या करणे चुकीचे आहे. काही तरी उपाय करता येणे शक्य झाले असते. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीने आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर कितीजण व कसे जीवन जगतात याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. त्याच वेळी त्याला समजेल की आपण त्यांच्यापेक्षा किती तरी पटीने सुखी आहोत. दुसरे म्हणजे परिस्थितीशी लढता येणे महत्त्वाचे आहे व तशी इच्छा दाखवणे आवश्यक आहे.
सरांनी मला त्यांच्याकडील दोन उदाहरणे सांगितली. त्यांच्या घरासमोर एक गिफ्टआर्टिकलचे स्टोअर होते. कित्येक छोट्या-मोठ्या इम्पोर्टेड वस्तू व अगदी एअर कंडिशनही होते. वस्तूही त्या मानाने महाग होत्या, तरी लोक घेत असत. पण आता करोना व लॉकडाऊनमुळे एकदमच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे असल्या वस्तू घ्यायला कोणी बाहेर जात नाही. त्या दुकानदाराने काही दिवस वाट पाहिली नंतर प्रथम दुकानाचा एसी बंद केला. त्या महागड्या वस्तू एका बाजूला ठेवल्या व चक्क भाजीपाला, ब्रेड आणि ब्रेड बटर विकायला सुरुवात केली.
त्यामुळे दोन गोष्टी झाल्या, एकतर त्याचे दुकान बंद झाले नाही. कारण या अत्यावश्यक वस्तू आहेत. दुसरे म्हणजे ज्या लोकांना माहीत आहे ते भाजीपाला घेण्याकरता गेले आणि एखादी वस्तू त्यांना हवी असेल तर तीही विकत घेतात. अर्थात, पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही. पण काम तर चालू राहिले. तोही यामुळे गुंतून राहिला व हळूहळू नवीन व्यवसाय का होईना चालू झाला. दुसरा माझा रिक्षावाला. आता घरोघर जाऊन कांदे, बटाटे, लसूण विकतो. त्याची विक्रीही रोज चांगली होते. सर पुढे म्हणाले की, प्रथम संकटाशी सामना करण्याची इच्छाशक्ती हवी.
मग मीसुद्धा सरांना म्हणालो, आमच्या गावाकडेही महिला बचत गटाने काम सुरू केले आहे. एका संस्थेला ते मास्क पुरवत आहेत. पुन्हा वापरता येऊ शकणारा मास्क या महिला शिवतात. त्यांना लागणारा माल ती संस्था आणून देते व दोन दिवसांनी पुन्हा मास्क घेण्यास संस्थेचे लोक येतात. त्यामुळे आवश्यक असणारे मास्कही लोकांना उपलब्ध होतात व बचत गटातील महिलांनाही काम मिळून चार पैसे मिळतात. तसेच माझ्या मित्राचा नेलपेंट व इतर सौंदर्य प्रसाधने बनवून देण्याचा व्यवसाय आहे. त्यात मंदी असल्याने त्याने सॅनिटायझर व लिक्विड सोप बनवणे चालू केले असून त्या वस्तू हातोहात संपत आहेत.
सर त्यावर म्हणाले की, थोडे डोके चालवून सध्या काय आवश्यक आहे व कोणत्या वस्तूला सध्या मागणी आहे, त्याप्रमाणे त्याचे उत्पादन सुरू केले तर नक्कीच मरण नाही. पण हे सर्व साधण्यासाठी स्वत:ची इच्छाशक्ती असणे महत्त्वाचे आहे. शेवटी इच्छा तेथे मार्ग हेच खरे.