सातारा -सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत चार फुटांनी वाढ झाली असून पाणीसाठा चौदा फुटांवर गेला आहे. पावसामुळे पाणीसाठा हळूहळू वाढू लागल्याने आता सातारकरांची पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. कास परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर पकडला असून जनजीवन गारठले आहे.
कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट सुरू होती. 25 फूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या तलावात केवळ सात फूट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, गेल्या सात- आठ दिवसांपासून कास व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने तलावाच्या पाणीपातळीत चार फुटांनी वाढ झाली आहे. सध्या तरी तलावात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने नागरिकांची टंचाईतून सुटका होणार आहे. यंदा जून महिना सरला तरी मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही.
मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असती तर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असता. मात्र, पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कास तलावाच्या उंचीवाढीचे काम जलसंपदा विभागाकडून मार्गी लावण्यात आले आहे. त्यामुळे तलावात यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. तलावात पाणीसाठा वाढविल्यास यापुढे सातारकरांची पाणीटंचाईच्या समस्येतून कायमची सुटका होणार आहे. सध्या कास तलावाची पाणीपातळी चौदा फूट झाली असली तरी म्हणावा तसा पावसाचा जोर नाही. सध्या झऱ्याला पाणी आले असून तलावाच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे, अशी माहिती कासचे पाटकरी जयराम किर्दत यांनी दिली.