नवी दिल्ली – रडार नियंत्रकाने अखेरच्या क्षणी दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोन विमानांची हवेतील टक्कर टळली. ती घटना 9 जानेवारीला बंगळूर विमानतळावरून हवेत झेपावलेल्या इंडिगो कंपनीच्या दोन विमानांशी निगडीत आहे. संबंधित घटनेची चौकशी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सुरू केली आहे.
बंगळूरहून कोलकता आणि भुवनेश्वरला निघालेल्या दोन विमानांनी 9 जानेवारीला सकाळी उड्डाण केले. सुमारे 5 मिनिटांच्या अंतराने दोन्ही विमाने हवेत झेपावली. सुमारे 3 हजार फुट उंचीवर असताना ती विमाने एकमेकांच्या अगदी जवळ आली.
त्यावेळी रडार नियंत्रकाने प्रसंगावधान दाखवून दोन्ही विमानांना वेगवेगळी दिशा दिली. त्यामुळे विमानांची हवेत संभाव्य टक्कर होण्याचा मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानांमध्ये मिळून 400 हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते.
दरम्यान, संबंधित घटनेची गंभीर दखल घेऊन डीजीसीएने चौकशी सुरू केली आहे. संबंधित प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत डीजीसीएने दिले आहेत. त्या घटनेची कुठल्या लॉगबुकमध्ये नोंद करण्यात आलेली नसल्याचे समजते.