अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकरी चिंतेत
रावणगाव -रब्बी हंगामात खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे स्वामी चिंचोली, रावणगाव परिसरातील शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढलेला दिसून येत आहे.
या भागात सध्या मका काढणीला सुरूवात झाली आहे. या वर्षी बदलत्या हवामानामुळे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव फार मोठया प्रमाणावर झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना या किडीच्या नियंत्रणासाठी 3 ते 4 वेळा किटकनाशकांची फवारणी करावी लागली. त्यातच सध्या आहे त्या दरामध्ये अपेक्षित वाढ न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
राज्य आणि केंद्र सरकार रब्बी हंगामात उत्पादित झालेल्या शेतमालाचा हमीभाव ठरवते. त्यानुसार शेतकरी कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतो. या वर्षी सरकारने मका पिकासाठी 1760 रूपये प्रति क्विंटल असा हमीभाव ठरवला आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे.
यामध्ये बियाणे, खते, औषधांचे वाढणारे दर, मजूर टंचाई त्यामूळे वाढलेले मजुरीचे दर यामुळे एकरी पाच ते आठ हजार रुपये अधिक खर्च वाढला आहे. दरवर्षी एकरी सरासरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन होत असते, परंतू या वर्षी लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांची वाढ योग्य न झाल्याने उत्पादन 15 ते 20 क्विंटल पर्यंत येणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सरासरी एकरी पाच क्विंटल प्रमाणे जरी उत्पादन घटले तरी चालू बाजारभावाप्रमाणे एकरी 8 ते 10 हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादन कमी त्यात बाजारभाव कमी व उत्पन्ना पेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.