तावरे व पवार गटाचे पॅनल जाहीर
अनुभवी आणि युवा उमेदवारांचा “ताळमेळ’
बारामती (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात 2015मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. आता पाच वर्षांनी त्यांनी 2020च्या निवडणुकीसाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे; मात्र त्यांच्यासमोर सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष रंजन तवारे या तुल्यबळ अशा गुरू-शिष्याची जोडी पुन्हा उभी ठाकली आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पवार गटाचे “पॅकअप’ होणार की तावरे गटाचे हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दरम्यान, दोन्ही गटाचे “पॅनल’ जाहीर झाले असून दोन्ही पॅनलकडून त्या-त्या गटात तुल्यबळ सामना होणार असल्याने यात कोणता गट वरचढ ठरणार हे सोमवारी (दि. 24) निकालानंतर स्पष्ट होणार आहे. आता पुढील 13 दिवस माळेगावच्या “रणा’त एकमेकांवर राजकीयसोबतच वैयक्तीक “चिखलफेक’ रंगणार आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी (दि. 10) शेवटच्या दिवशी तावरे गटाच्या सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनल तर राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनेल रविवारी (दि. 9) रात्री उशीरा जाहीर झाला आहे. दोन्ही पॅनलमध्ये अनुभवी आणि युवा उमेदवारांचा “ताळमेळ’ साधल्याने निवडणुकीत रंगत वाढवली आहे. दरम्यान, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 301 पैकी तब्बल 245 जणांनी माघार घेतली असून मैदानात 56 उमेदवार रिंगाणणात असून त्यातील 42 दोन्ही पॅनलचे आहेत. तर उर्वरीत 14 उमेदवार अपक्ष असल्याने ते कोणत्याला गटाला मारक ठरणार अन् कोणत्या गटाला तारक ठरणार हे निवडणूक निकालानंतर समजणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला दगाफटका बसणार?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक खासकरून राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मातब्बरांसह इच्छुकांची मांदियाळी होती. त्यामुळे त्यातील तुल्यबळ आणि कारखाना क्षेत्रातील भरघोस ज्ञान, विरोधकांचे खाचखळगे माहित असलेला, सभासदांचा विश्वास संपादन असलेला असा उमेदवार शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कस लागला होता; मात्र पॅनल घोषित केल्यानंतर इच्छुकांचा भ्रमनिरास झाला असून नाराज गटही वाढला आहे. त्यामुळे हा नाराज गट राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरणार असून त्यांना दगाफटकाही बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार आता या नाराजांना कसे खूश करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
खासगी साखर कारखानदारांनी सहकारी साखर कारखाने मोडीत काढण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सहकार बचाव हा आमचा नारा आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने साखर उतारा प्रमाणे राज्यात उच्चांकी दर दिला आहे. त्यामुळे सभासदांना दरवाढीसाठी पाच वर्षात मोर्चे, आंदोलने करावी लागली नाहीत. येथून पुढील काळात देखील माळेगाव सहकारी साखर कारखाना उच्चांकी भाव देण्यास तत्पर असेल. साखर धंद्यात स्पर्धा निर्माण झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे. आगामी काळात साखर धंद्यातील “गुजरात पॅटर्न’ माळेगावच्या कारखान्यात अवलंबणार आहे, त्यामुळे उच्चांकी दराची परंपरा कायम राखली जाईल. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून बेछुट आरोप केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र उच्चांकी दराचे आकडे बोलत आहेत.
– रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना
कोणत्या मुद्द्यावर रान पेटणार?
राष्ट्रवादीच्या पॅनलला 2015च्या निवडणुकीत मोठा धक्का बसला होता. तेव्हाही माळेगाव कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. पण तावरे आणि काकडे हे पवारांचे पारंपरिक स्थानिक विरोधी प्रथमच सहकार बचाव पॅनलच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याने आणि सहकार कारखानदारीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर खासगी साखर कारखाने काढल्याने तावरेंच्या गटाने या मुद्द्यावर अजित पवारांविरोधात रान पेटवले होते. याच मुद्द्यावर अजित पवारांना हा पराभव पत्करावा लागला होता. तर यंदा सर्वाधिक दरावर अजित पवारांना पुन्हा कोंडीत पकडण्याचा डाव तावरे गट खेळणार का? पण यंदा अजित पवार यांनी काकडे गटाला आल्याकडे खेचले असल्याने यंदा त्यांची ताकद पवारांना मिळणार असे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील 13 दिवस तावरे गट व पवार गट कोणत्या मुद्द्यावर रान उठवणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
शेतकरी कोणाला तारणार?
माळेगाव कारखान्याची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सोमवार (दि. 10) पासून सुरू झाली असून रविवारी (दि. 23) निवडणूक असून प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि. 21) सायंकाळी थंडावतील. या 13 दिवसांत दोन्ही पॅनलचे स्टार प्रचारक उमेदवारांसाठी मैदानात उडी घेणार आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणखी किती प्रचारक मैदानात उतरणार हे पाहावे लागेल. तावरे गटाने कोणत्याही पक्षाची मदत घेतली नसली तरी त्यांना भाजपकडून मदत मिळणार असे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ताकदच तावरे गटाची असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही शेतकऱ्यांची ताकद मारणार का? हे लवकरच कळेल.