जम्मू -भारतीय लष्कराने मंगळवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत सशस्त्र दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. ती घटना उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात घडली.
पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) आलेल्या दहशतवाद्यांच्या गटाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. तो गट भारतीय हद्दीत सुमारे पाचशे मीटर आतपर्यंत पोहचला.
मात्र, सतर्क भारतीय जवानांनी वेळीच दहशतवाद्यांच्या हालचाली हेरल्या. जवानांनी आव्हान दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये काही काळ चकमक झडली. जवानांच्या माऱ्याला घाबरून घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांनी माघारी पलायन केल्याचा अंदाज आहे. चकमकीत एक जवान जखमी झाला.
त्याला उपचारासाठी तातडीने लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टीमने (बॅट) कुपवाडाच्या केरन क्षेत्रात भारतीय ठाण्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तो हल्ला परतवून लावत भारतीय लष्कराने बॅटच्या पाच ते सात सदस्यांचा खात्मा केला. बॅटमध्ये पाकिस्तानी कमांडोंबरोबरच दहशतवाद्यांचा समावेश असतो.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधी भंगाची आगळीक
पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा शस्त्रसंधी भंगाची आगळीक केली. पाकिस्तानी सैनिकांनी एलओसीलगत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मारा केला. त्यांनी भारतीय सीमा ठाण्यांबरोबरच रहिवासी भागांना लक्ष्य केले. त्यात कुठली हानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानी माऱ्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले.