पुणे – मुंबईच्या वरीष्ठ संघात मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा समावेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुळात 20 खेळाडूंचा संघ घोषित केल्यानंतर दोनच दिवसांनी आणखी दोन खेळाडूंची निवड कशी करण्यात आली, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने तसेच संघटनेच्या निवड समितीीतील सदस्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मुश्ताक अली स्पर्धा येत्या 10 जानेवारीपासून सुरु होत आहे. संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. मुळ संघ जेव्हा जाहीर करण्यात आला तेव्हा 20 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी दोन खेळाडूंची निवड करण्यात आली व त्यात अर्जुनचा समावेश करण्यात आला.
डावखूरा मध्यमगती गोलंदाज असलेल्या अर्जुनसह आणखी एक मध्यमगती गोलंदाज कृतीक हनगवडी याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 21 वर्षांच्या अर्जुनने यापूर्वी वयोगट क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याला ऐभारतीय संघाचा नेट गोलंदाज म्हणूनही अनेकदा संधी देण्यात आली आहे.
तसेच श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील संघाच्या मालिकेतही त्याचा भारतीय संघात समावेश होता. त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघाने अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेतही नेट गोलंदाज म्हणून तो सहभागी झाला होता. आता मुश्ताक अली स्पर्धेतही त्याचा समावेश झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. याबाबत बोलण्यास संघटनेच्या सदस्यांनी नकार दिला आहे.
पडद्यामागे बॅटिंग सचिनची का ?
सर्वाधिक धावा करणारे अनेक खेळाडू सध्या मुंबईच्या वयोगट स्पर्धेत खेळत आहेत. तसेच मुंबई लीगमध्येही अनेकांनी चांगली कामगिरी केली आहे. मग एकट्या अर्जुनलाच संधी का असा प्रश्नही निर्माण होत आहे. अर्जुनच्या निवडीमागे त्याची कामगिरी कधी झाली व त्याने काय कामगिरी केली हे पाहिले गेले का त्याच्यासाठी सचिनने बॅटिंग केली असाही प्रश्नही निर्माण झाला आहे.