पुणे – यंदाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन नक्की कोठे होणार याबाबत साशंकताच होती. मात्र, रविवारी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत स्थळ निवड समिती स्थापन केली असून, समितीच्या निर्णयानंतरच संमेलन स्थळाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे रसिकांना 8 जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
करोनामुळे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन लांबणीवर पडले होते. मात्र, केव्हा आणि कोठे होणार याबाबत निश्चितता नव्हती. यंदा दिल्ली येथे संमेलन घेण्याबाबत सरहद संस्थेने देखील निमंत्रण दिले होते. त्यामुळे दिल्ली किंवा नाशिक या शहरांमध्ये संमेलन होण्याबाबत मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. काही या चर्चेला काहीसा पूर्णविराम मिळाला असून, 8 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत संमेलनाचे ठिकाण निश्चित होणार आहे.
रविवारी (3 जानेवारी) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कपूर वासनिक, प्रा. उषा तांबे, उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विलास मानकर, गजानन नारे हे उपस्थित होते. यावेळी महामंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सन 2019-20 चा अंकेक्षित अहवाल सादर केला. यासह सन 2020-21 च्या आर्थिक नियोजनाला मान्यता देण्यात आली.
या बैठकीत साहित्य संमेलन स्थळनिवड समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. ही समिती 7 जानेवारी रोजी नाशिक येथे भेट देणार असून अहवाल देईल. त्यानंतर 8 तारखेला औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत संमेलनाच्या ठिकाणाबाबत शिफारस करणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
दिल्लीसाठीचे निमंत्रण मे महिन्यातील होते. त्यामुळे 8 तारखेच्या बैठकीत संमेलनाच्या स्थळाबाबत निश्चिती होईल. 31 मार्च पूर्वी यंदाचे संमेलन होणार आहे, असे ठालेपाटील यांनी सांगितले.