नवी दिल्ली : आगलावू भाषणे केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवावी अशी मागणी करणाऱ्या ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्तांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात बुधवारी सुनावणी होणार आहे. दंगलग्रस्तांच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायधिश एस. ए. बोबडे यांनी सोमवारी मान्यता दिली.
सुधारीत नागरिकत्व कायद्याचे समर्थक आणि विरोधकांच्यात झालेल्या दंगलीत आतपर्यंत दिल्लीत 46 जण मरण पावले आहेत. तर 200पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक घर आणि दुकाने पेटवून देण्यात आली. सुमारे 500 वाहने जळून खाक झाली. ज्येष्ठ विधीज्ञ कोलीन गोन्सालवीस यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.
गोन्सालवीस म्हणाले, या दंगलीत अद्याप लोक मरत असूनही याबाबत सुनावणी घेण्यसाठी दिल्ली उच्च न्यायलयाने चार आठवडे लावले आहेत.
दंगल आटोक्यात आणण्यासाठी दबाव टाकण्याची आयुधे न्यायलायाकडे नाहीत, असे सांगत न्यायलयाने या विषयावर सुनावणी घेण्याचे मान्य केले.
लवकर शांतता नांदावी अशी इच्छा व्यक्त करतानाच न्यायालयाने आपल्याला मर्यादा असल्याचे सांगितले. आम्हीॅ सुनावणी घेऊ पण तुम्ही लक्षात घ्या. न्यायलय घटना घडून गेल्यानंतर त्यात येत असते. आम्हाला शांतता हवी आहे. मात्र आम्हाला मर्यादा आहेत. माध्यमांमध्ये न्यायलय जबाबदार असल्याचे वृत्त प्रकाशीत झाली आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.