नवी दिल्ली : दिल्लीच्या ईशान्य भागात गेले तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचारात किमान 500 वाहने, 79 घरे, 52 दुकाने, तीन कारखाने आणि दोन शाळा पेटवण्यात आल्या, अशी माहिती अग्नीशामक दलाच्या सुत्रांनी दिली.
आग लागल्याचे 281 दूरध्वनी आले. त्यातील 25 दूरध्वनी वाहने पेटवल्याचे होते. जेव्हा अग्निशामक दल घटना स्थळावर पोहोचले तेंव्हा 500 वाहने पेटवल्याचे आढळून आले. दंगलग्रस्त भागात अग्निशामक दलाच्या बंबांनी एक हजार फेऱ्या केल्या. आलेल्या कॉलपैकी 28 कॉल बोगस होते. तर 15 कॉल चांगल्या हेतूने केल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान उच्च न्यायालयाने दंगलग्रस्त भागातील दहावीच्या परीक्षा केंद्रांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी दाखल केलेल्या खटल्यावर न्या. राजीव शकदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू झाली. त्यावेळी न्यायलयाने सांगितले, परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण झाले पाहिजे. शिवाय तेथे सुरक्षेत कोणतीही कमतरता रहायला नको.
या दंगलीत आतापर्यंत 42 जण मरण पावले आहेत. 350 जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी 123 एफआयआर दाखल केल्या असून 630 जणांना अटक केली आहे.