वाल्हे – पुणे-पंढरपूर महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग, सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, कापडदरा, झिरप वस्ती आदी लहान-मोठ्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सुकलवाडी रेल्वे गेट येथील भुयारी मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्गच प्रवासी, रहिवाशांसाठी धोकादायक बनला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
सुकलवाडी फाट्यावरील रेल्वे गेटचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम हाती घेतले होते. पालखी सोहळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काम कासवगतीमुळे पूर्ण झाले नव्हते; परंतु वाल्हेसह सुकलवाडी, मुकदमवाडी अंबाजीची वाडी गायकवाड वाडी, गुळुंचे, कर्नल वाडी, राख आदी भागांना जोडणाऱ्या भुयारी मार्गावरून प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी नेहमीच ये-जा करतात. या गावांमधील नागरिकांना वाल्हे येथील बाजारपेठेत यावे लागते. साचलेल्या पाण्यातूनच दिवसभरात अनेक दुचाकी-चारचाकी वाहने जात असतात आणि पाण्यात बंद पडत असतात असे येथील नागरिकांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पालखी सोहळा रद्द झाला आहे. पालखी सोहळ्यातील वैष्णवांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत होते. मागील वर्षी रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम हाती घेतले होते आणि पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी येण्यापूर्वी हे काम पूर्ण होणार होते, असे सांगितले जात होते. यावर्षी तरी हे काम पूर्ण होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उमटत आहे.
खासदार सुळेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष
गेल्यावर्षी सोहळ्यापूर्वी पावसामुळे पाणी साचले होते, तेव्हा भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने ठेकेदारने जनरेटरच्या साह्याने मार्गावरील पाणी उपसले होते. यावर्षी सोहळा असता तर भुयारी मार्गावरील पाण्यातून वारकऱ्यांना जीव धोक्यात घालून जावे लागले असते. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासनाला काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या होत्या. संबंधितांनी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कायमस्वरूपाच्या उपाययोजनेची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.