ग्लासगो- चीनने लडाख भागात जो घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यावरून भारतात तर संतापाची लाट आहेच, मात्र पाकव्याप्त काश्मिरमध्ये आणि जगभरात विखुरलेल्या येथील नागरिकांमध्येही यामुळे संताप आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना व्याप्त काश्मिरमधील एका नागरिकाने आपली ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली. इतकेच नव्हे, तर उद्या जर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष झालाच तर आम्ही भारताच्या बाजूने त्यात थेट सहभागी होउ असेही त्यांनी म्हटले आहे.अमजद अयुब मिर्झा हे त्यांचे नाव आहे. ते व्याप्त काश्मिरचे असून सध्या ते ब्रिटनच्या ग्लासगो येथे राहतात.
ते म्हणाले की गेल्या सत्तर वर्षांपासून पाकव्याप्त काश्मिर, गिलगीट बाल्टीस्तानलाभारतापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे भारताला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो आहे. पाकिस्तान आणि नेपाळची कम्युनिस्ट पार्टीही याच वेळी भारतासोबत घाणेरडा खेळ खेळते आहे. मात्र या स्थितीत आम्ही भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत.
मी व्यक्तीगत स्तरावर भारताकडूनच लढणार. जेथे भारतीय जवानांचे रक्त सांडेल तेथे आम्ही मोर्चा सांभाळू. 135कोटी भारतीय आणि व्याप्त काश्मिर व गिलगीट बाल्टीस्तानमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डिवचण्याची चूक चीनने केली आहे. गरज पडली तर शत्रुशी लढण्यासाठी भारतीय लष्करात दाखल होण्याचीही आमचीतयारी आहे. चीनचे आक्रमक धोरण आणि आंतरराष्ट्रीय सीमांचे त्यांच्याकडून सातत्याने केले जात असलेले उल्लंघन यामुळे आज जगातले बहुतेक प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे आहेत, असा इशाराहीत्यांनी दिला.