माण आणि खटाव तालुक्यातील काही भागांना सध्या फक्त उरमोडीचे पाणी काही प्रमाणात मिळत आहे. मात्र, इतर योजनांपैकी जिहे- कठापूर, टेंभू, तारळीचे पाणी मिळण्यासाठी अजूनही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यात जिहे कठापूर वगळता सातारा जिल्ह्यातील भागासाठी टेंभू व तारळी प्रकल्पातील पाणी अधिक मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या त्रुटी लक्षात घेऊन आता पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठीच राजकारणाचे जोडे बाजूला ठेवावे लागतील.
माण व खटावची तहान भागविण्यासाठी पश्चिमेकडील पाणी उचलून आणण्याच्या पर्यायाचा अवलंब सध्या केला जात आहे. त्यात प्रामुख्याने उरमोडी धरणाचे पाणी दोन्ही तालुक्यांच्या दक्षिणेकडील भागांना काही प्रमाणात मिळू लागले आहे. त्यातही यासाठी उरमोडी धरणातून थेट कालवा काढलेला नाही. उरमोडी धरणातून काढलेला कालवा यवतेश्वरच्या डोंगराखालून कण्हेरच्या कालव्याला जोडला आहे. कण्हेरच्या कालव्यातून जाणारे पाणी सांगली जिल्ह्यात जाते. त्यामुळे उरमोडीचे किती पाणी खटावकडे जाते आणि किती पाणी सांगलीकडे जाते, याचा हिशोब कुणाकडे असेल असे वाटत नाही.
तरीही उरमोडीचे पाणी मिळते आहे, हेही काही कमी नाही. उरमोडीखेरीज जिहे कठापूर, टेंभू आणि तारळी या प्रकल्पातून पाणी मिळावी अशी अपेक्षा आहे. यापैकी फक्त उरमोडीचे पाणी मिळते आहे. इतर पाण्याची अजूनही प्रतीक्षाच आहे. त्यात जिहे- कठापूरकडून मिळणारे पाणी या दोन्ही तालुक्यांसाठी आहे. परंतु, टेंभू आणि तारळीचे पाणी सांगली जिल्ह्यालाही जाते, हे लक्षात घेतले पाहिजे. टेंभूच्या 22 टीएमसी पाण्यापैकी सातारा जिल्ह्याला फक्त 0.1 टीएमसी पाणीच जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. ते पाणी वाढवून मिळावे यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. डॉ. दिलीप येळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे टेंभूतील काही पाणी केवळ पिण्यासाठी म्हणून मायणीसाठी मान्य केले आहे. मात्र, शेतीसाठी पाणी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे,
तरीही त्याचा किती उपयोग होईल, हे आता सांगता येत नाही. जिहे कठपूरचे पाणी वर्धनगडच्या बोगद्यातून नेर तलावापर्यंत नेण्याची चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे आता हे पाणी दोन्ही तालुक्यांतील काही भागाला मिळेल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या कामाचीही गती संथ आहे. ही योजना परिपूर्ण झाली तरच या योजनेतून दोन्ही तालुक्यांच्या उत्तर भागाला पाणी मिळू शकते. या भागाला दुसरा पर्यायच नाही, हे लक्षात घेऊन पाठपुरावा झाला पाहिजे.
नेर तलावात हे पाणी पोचल्यावर ते खटाव तालुक्यातील भागालाही मिळेल. त्याशिवाय माण तालुक्यात कुळकजाईपासून पुढे जाऊन ते आंधळी धरणापर्यंतही पोहचू शकते. तेथून उर्वरित उत्तर भागातील शेतीसाठी ते देण्यासाठी पाठपुरावा हवा आहे. हे सारे व्हायचे असेल तर या कामाला गती मिळणे आवश्यक आहे. ती मिळाली तरच त्याच लवकर फायदा होऊ शकतो. आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधानांपर्यंत पोचून या योजनेचा समावेश केंद्रीय सिंचन योजनेत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून काही निधी मिळालाही आहे. पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. गरज लागली तर अजूनही खूप काही प्रयत्न करावे लागणार आहेत. जिहे कठापूरची ही अवस्था असातना टेंभू आणि तारळीचे अधिकचे पाणी मिळविण्यासाठी राज्य शासनाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पाडावे लागणार आहे. हे सारे करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील सर्वांनी एकत्रित लढाई केली तरच ते शक्य होणार आहे. (क्रमश:)