सातारा -देशभर उष्णतेचा प्रकोप सुरू असताना साताऱ्यातही उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अधूनमधून होणाऱ्या भारनियमनामुळे पंखे, एसी, कुलर बंद राहत असल्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.
मागील काही दिवसापासून जिल्हावासीय कडक उन्हाळ्याचा सामना करत आहेत. हवामान विभागाने उष्णतेचा प्रकोप आणखी दोन- तीन दिवस टिकेल असे सांगितल्यामुळे सातारकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर पोहोचला होता. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. नागरिक उकाड्याने हैराण होत असून त्यावर गारव्याचा पर्याय शोधला जात आहे. शहरामध्ये थंड उसाचा रस, लिंबू पाणी आणि तत्सम पदार्थांची मागणी वाढली आहे. दुपारच्या वेळी शहरातील वर्दळीची पोवई नाका, मोती चौक, समर्थ मंदिर चौक आदी ठिकाणे सुनसान होत आहेत. अधूनमधून ढगाळ हवामानामुळे नागरिकांची तगमग आणखी वाढत आहे.
पाऊस हुलकावणी देत आहे. खंडित वीजपुरवठ्याचा फटका लोकांना बसत असून वाढत्या उन्हाच्या झळांनी सातारकरांची काहिली होत आहे. उन्हाच्या झळांमुळे दुपारी एक ते चार बाजारपेठेतील संपूर्ण व्यवहार ठप्प असून घराबाहेर न पडण्याचा सल्ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. वैशाख वणव्याची झळ प्रत्यक्षात सुरू व्हायची आहे. मात्र, चैत्रात सातारकरांचा घामटा निघाल्यामुळे मे महिन्याचे ऊन कसे असणार आहे या कल्पनेने सातारकरांच्या अंगावर काटा आला आहे.
मिनी काश्मिर ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, तापोळा येथील तापमानही 36 अंश सेल्सिअसवर गेल्याने पर्यटकांनाही उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हातही बळीराजाची खरीपाची पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. अशा काळामध्ये डॉक्टरांनी डिहायड्रेशन होऊ नये याकरिता सातत्याने पाणी पीत राहण्याचा सल्ला दिला असून बरोबर उसाचा रस, फळांचा रस, लिंबू पाणी आणि डिकोरेल विटामिन ज्यूससारखे पर्याय सुचवले आहेत.