मुंबई – केंद्र सरकार मागणी वाढविण्यासाठी आकर्षक पॅकेज जाहीर करील, या अपेक्षेने गेल्या महिनाभरात शेअरबाजारांमध्ये खरेदी वाढून निर्देशांक उच्च पातळीवर गेले होते. मात्र, काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनंतर शेअरबाजारातील खरेदी मंदावली आहे.
मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 31 अंकांनी म्हणजे 0.08 टक्क्यांनी वाढून 40,625 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 3 अंकांनी वाढून 11,934 अंकांवर बंद झाला.
उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, मागणी वाढविण्यासाठी अत्यल्प पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही, असे गुंतवणूकदारांना वाटते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या बायबॅक करीत आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची फारशी खरेदी झाली नाही.
विप्रो बाय बॅक करणार
विप्रो कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार कंपनीचा नफा 3.4 टक्क्यांनी कमी होऊन 2,465 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा कमी झाला असला तरी या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यामध्ये 3.2 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने अपेक्षेप्रमाणे 9,500 कोटी रुपयांच्या शेअरची फेरखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खराब परिस्थितीतही दुसऱ्या तिमाहीत कंपनीने चांगला ताळेबंद जाहीर केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आगामी काळाबद्दलही कंपनी आशावादी आहे.