नवी दिल्ली – तोक्ते चक्रीवादळ आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज (दि 18) सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या तयारीबद्दलची माहिती दिली.
मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय म्हणाले –
अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
विशेषतः कोरोना परिस्थितीत रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे.
बॅकअप यंत्रणा लगेच कार्यान्वित होईल व रुग्णांच्या उपचारांत अडथळा येणार नाही यासाठी सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्याची ऑक्सिजनची गरज लक्षात घेता सागरी किनाऱ्यांवरील ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पांमधील उत्पादन व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन.
जम्बो व इतर कोविड केंद्रे पावसापासून संरक्षण करणारी असली तरी मोठे वादळ झाल्यास समस्या उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन सावधगिरी म्हणून मुंबई तसेच इतरत्रही या केंद्रांतील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.
किनाऱ्यांवरील कच्च्या घरांतील लोकांना दुसरीकडे हलवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिसांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षाचा इतर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षांशी व्यवस्थित समन्वय आहे.