पुसेगाव – देशामध्ये व राज्यामध्ये पाणीपुरवठा विभागाने क्रांती केली असून जलजीवन योजनेतून 38 हजार गावांना पाणी देण्याचे काम या सरकारने केले असून 1208 कोटी रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन केले आहे. आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघात जलजीवन योजनेपासून कोणतेच गाव वंचित ठेवले नाही, असे स्वच्छता व पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी पुसेगाव येथील जाहीर सभेत सांगितले.
पुसेगाव (ता. खटाव) येथे पुसेगाव, बुध, खटाव या गावांतील जलजीवन मिशन योजनांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीरशेठ जाधव, माजी पंचायत समितीच्या सदस्या नीलादेवी जाधव, डॉ. प्रियाताई शिंदे, माजी सरपंच भरत मुळे, बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे, खटावचे सरपंच नंदकुमार वायदंडे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे , पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार किरण जमदाडे आणि ग्रामपंचायत सदस्य, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. पाटील म्हणाले, “”शिंदे- फडणवीस सरकारमध्येही मला पुन्हा पाणीपुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. भविष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला 24 तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर करुन मला महाराष्ट्राचा पाणीवाला बाबा व्हायचंय.” करोना काळात आ. महेश शिंदेंनी सर्वाधिक काम केल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
कोरेगाव मतदारसंघातही जास्त निधी आमदार महेश शिंदेनी आणला आहे. पण इथे श्रेयवादातून पोरगं कुणाचं आणि बारसं कोण घालतंय अशी अवस्था झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आमदारकीपेक्षा कठीण असतात. पाणीप्रश्नावर राजकारण होऊ नये. सर्व योजना मार्गी लागाव्यात, असे त्यांनी सांगितले. आमदार महेश शिंदे म्हणाले, “”खटावच्या दुष्काळी भागाचा आणि सिंचनाच्या पाण्याचा बॅकलॉग शिंदे- फडणवीस सरकारने भरून काढला आहे. जिल्हयात यशवंतराव चव्हाण यांचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांनी 2008 मध्ये जिहे- कठापूर योजनेचा नारळ फोडला होता. मात्र, प्रत्यक्षात योजना मार्गी न लावता दुष्काळी भागाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम त्यांनी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे- कठापूर योजनेचे पाणी दुष्काळी भागाला दिले. या योजनेत अधिकची गावे समाविष्ट करून दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय सध्याच्या सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बुध, खटाव पाणीपुरवठा योजनांचे ई- भूमीपूजन करण्यात आले. प्रास्तविक रणधीर जाधव यांनी केले. सूत्रसंचलन अजित चव्हाण यांनी केले. उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी आभार मानले.