मुंबई – मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल मुंबई पालिकेकडे आहे. मग टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का दिले जात आहे असा सवाल करत मुंबईतील पश्चिम-पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करावे, अशी मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी दोन मागण्या बीएमसी प्रशासनाला केल्या आहेत. एक तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे या दोन्ही रस्त्यावरील टोल नाके बंद करावेत आणि वन टाइम सेटलमेंट करावेत. या रस्त्यावरील जाहिरातीचा रेव्हेन्यू बीएमसीला देण्यात यावा, एमएसआरडीसीने घेऊ नये. नोव्हेंबरमध्ये हे दोन रस्ते बीएमसीकडे मेंटनन्ससाठी हस्तांतरित केले आहेत.
या मागण्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही. आमचं सरकार लवकरच येईल, तेव्हा आम्ही हे टोल बंद करू. सरकार पडयाची वेळ जवळ आली आहे. खोके सरकारला किती पैसा जातो माहीत नाही, त्यांची वसुली सुरू आहे. आम्ही जनेतचा विचार करतो, ते खोक्यांचा विचार करतात. मुख्यमंत्र्यांना राजकीय कार्यक्रमाला वेळ आहे. पण बेस्ट आणि मुंबईकरांसाठी वेळ का नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
दरम्यान, रस्त्यांवरील खड्ड्यांवरून बीएमसीला नेहमीच टार्गेट केले जात आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांमुळे बीएमसीला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभालीचे काम आधी एमएसआरडीसीकडे होते. पण, ते योग्यरित्या होत नसल्याने शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर हे काम मुंबई पालिकेकडे सोपवण्यात आले.