जयपूर – राजस्थानातील करौली येथे जातीय दंगलीनंतर तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी 46 जणांना अटक केली असून या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या 46 जणांपैकी 13 जण हिंसाचाराशी संबंधित आहेत. तर 33 जणाना संचारबंदीच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
7 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर 21 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेनंतर ही जातीय दंगल भडकली होती.
सोमवारी सकाळी दोन तासांसाठी संचारबंदी शिथील करण्यात येणार आहे आणि संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले.
गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात आलेली शोभायात्रा मुस्लिम बहुल वस्तीतून जात असताना या शोभायात्रेवर दगडफेक आणि तोडफोडीला सुरुवात झाली होती. या दगडफेकीमध्ये किमान 35 जण जखमी झाले होते. दंगलीनंतर अफवा पसरू नयेत म्हणून रविवारी मोबाईल इंटरनेट स्थगित करण्यात आले होते. दंगलीदरम्यान मोबाईलवर करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील दोषींची ओळख पटवण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.