सोनई – सहकार क्षेत्रातील ताळमेळ पत्रक संदर्भात असणारे आंदोलन मोडीत काढल्याने त्याचे खापर सेवा सोसायटीमधील सचिवांच्या माथी मारुन जाणीवपूर्वक सचिवांना वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने आता सचिवांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
येत्या 10 मेपासून क्रांतिसुर्य जिल्हा सचिव संघटनेने बॅंक व शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप बढे व सरचिटणीस रामदास सोनवणे यांनी दिली. नुकतेच या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा सहकारी बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हास्तरीय समिती, जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले आहे. राज्यपातळीवर सचिवाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार मंत्री अतुल सावे यांनी समिती गठीत करुन अहवालाचे कामकाज अंतिम टप्यात असताना एकमेव नगर जिल्ह्यातील सचिवांचे तीन महिन्यापासून पगार रखडून ठेवण्यात आले आहे.
वेळवेळी लेखी पत्रव्यवहार करुन देखील जाणीवपूर्वक वेतन अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्यस्तरीय समितीचा कोणताही आदेश जिल्हा संघटनेला प्राप्त न झाल्याने माहीती देता आली नाही, असे असताना सहकार आयुक्त पातळीवर केलेल्या समितीच्या निर्णय येण्यापूर्वी प्रशासनाने सचिवांचे वेतन बंद केला. ताळमेळ पत्रक आदेशबाबत वरिष्ठ अधिकारी वेतन करण्यासाठी अगोदर ताळमेळ पत्रक देऊन त्यावर सचिवाने सही करुन देण्याची मागणी केली आहे. ती देण्याची अट घातल्याने कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सचिव वर्गात चीड निर्माण झाली असून काही सचिव रजेवर जाण्याच्या तयारीत आहेत.