वडूज – शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी लढणार्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माढा लोकसभा मतदारसंघाबाबतची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या उमेदवाराचा वीस-पंचवीस हजार मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात हक्काची मते असल्याने, यंदाच्या निवडणुकीतही संघटनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, वडूज येथे झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात माढा मतदारसंघाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार अध्यक्ष राजू शेट्टी यांना देण्याचे ठरविण्यात आले.
खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 50 हून अधिक शाखा आहेत. संघटनेने खटाव व माणमध्ये वीज प्रश्न, ऊस व आले पिकाच्या दरवाढीचे आंदोलन, शेतीच्या पाण्यासाठी लढे, शेतकर्यांशी संबंधित अन्य प्रश्नांवर उपोषणे, आंदोलने केल्याने सर्वसामान्य शेतकर्यांना संघटनेचे आकर्षण वाटत आहे. संघटनेच्या माढा मतदारसंघातील पदाधिकार्यांचा मेळावा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडूज येथे नुकताच झाला.
त्यामध्ये माढा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी की अन्य कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत विचारविनिमय करण्यात आला. पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अनिल पवार यांनी माढा मतदारसंघाबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार राजू शेट्टी यांना देण्याचे जाहीर केले. राजू शेट्टी देतील तो आदेश मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक-दोन दिवसांमध्ये पाठिंब्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, महविकास आघाडीतील काही नेत्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करून, राजू शेट्टी ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे माढ्यात कोणाला पाठिंबा द्यायचा आदेश राजू शेट्टी देणार याची उत्सुकता आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, खटाव-माण संपर्कप्रमुख शरद खाडे, वैभव पाटील, माण तालुकाध्यक्ष राजू मुळीक, केशव जाधव, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, शिवाजी पाटील, करमाळ्याचे गणेश मंगवडे उपस्थित होते.
संघटनेच्या पाठिंब्यासाठी सर्वच प्रयत्नशील
महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना स्वाभिमानीचा पाठिंबा मिळावा यासाठी अभय जगताप हे प्रयत्नशील आहेत. त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. परभणीतून महायुतीकडून मैदानात उतरलेल्या महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर हे माढ्यात बहुजन समाज पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. स्वाभिमानीचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनीही राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहिते पाटील यांच्या गोटातूनही शेट्टी यांच्याशी संपर्क साधला जात आहे. प्रभावी वक्ते, प्रामाणिक कार्यकर्त्यांचे जाळे स्वाभिमानीकडे आहे. त्यामुळे ही संघटना आपल्या बाजूने असावी, असा प्रत्येक उमेदवाराचा प्रयत्न आहे.