जामखेड – शहरात दिवसेंदिवस महिला व तरुणींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. विविध शैक्षणिक संस्था, गल्लीबोळात तरुणीचा पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. “कशाला नादी लागायचे?’ असे म्हणत तरुणींसह त्यांचे पालक शांत बसत असल्यामुळे टवाळखोरांची हिंमत वाढत आहे. त्यातच पोलिसांकडून रोडरोमिओंवर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई होत असल्याने रोडरोमिओंचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे शहरातील तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील शाळा, कॉलेज, क्लासेस परिसरासह नागरी वस्त्यांमध्ये रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. हे रोडरोमिओ महिला, मुलींची छेड काढत आहेत. यामुळे महिला व पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून छेडछाडविरोधी पथक सक्रिय करावे अशा मागणी होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. जामखेड बसस्थानकावर मोठी गर्दी असते. यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणीवर रोडरोमिओ लक्ष ठेवून राहतात. महाविद्यालयात येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या या ठिकाणी अधिक असते. जामखेड बसस्थानक ते बीड कॉर्नर, खर्डा रोड, कोर्ट रोड हा मार्ग शाळा, महाविद्यालये, विविध क्लासेस आदींमुळे सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या मार्गावर जागोजागी टवाळखोरांचे घोळके उभे असतात. विद्यालय भरतेवेळी व सुटतेवेळी या मुलींना दुचाकीवरून बसस्थानकात गावातील काही विशिष्ट ठिकाणी रोडरोमिओंचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयीन तरुणींना आपल्या जाळ्यात फसवण्यासाठी रोडरोमिओ तरुणीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन रस्त्यात अडवितात. आपल्या जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करतात. रोडरोमिओंमध्ये टवाळखोर तरुणांची संख्या अधिक असून, छेड काढण्यासाठी स्पोर्टस बाइकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बसस्थानकावर रोडरोमिओंची गर्दी असते. या गर्दीमुळे मुलींच्या छेडछाडीच्या प्रमाणात वाढच होत आहे. ग्रामीण मुलींना बसस्थानकावरच गाठून हे टोळके त्रास देतात. धक्के मारणे, छेडछाड करणे असे गंभीर प्रकारही या टोळक्यांकडून होतो. परंतु अद्याप या प्रकारांकडे कुणाचे लक्ष नाही.
घरून निघालेल्या मुलींच्या सुरक्षेबाबत नेहमी चिंता असल्यामुळे पालकांकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे. महाविद्यालयात प्रवेशद्वारातच ओळखपत्र सक्ती अद्यापपर्यंत केली गेलेली नाही. महाविद्यालयात येण्या-जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ओळखपत्र सक्ती करावी, अशीही मागणी होत आहे. अनेक वेळा महाविद्यालयीन तरुणीसोबत छेड काढण्याचे प्रकार या ठिकाणी झाले आहे. बसस्थानक आवारात टवाळखोर व रोडरोमिओ टोळी करून बसलेले असतात. परंतु पोलीस प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.