कोपरगाव – मागील काही दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागात भारनियमन सुरू असल्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे हे भारनियमन ताबडतोब रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली असून, गोदावरी कालव्यांना सध्या सुरू असलेल्या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून खरीप पिकांना सिंचनासाठी त्वरित पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशीही मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
माजी आ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, पावसाळ्याचे दोन महिने उलटले, तरी अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, तूर, मूग आदी पिकांची लागवड केली. पुढे पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु पावसाने पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले. पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. बहुतांश ठिकाणी शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यातच महावितरणने अनियमित भारनियमन सुरू केल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
याबरोबरच कोल्हे यांनी मतदारसंघातील पाटपाण्याच्या प्रश्नाकडेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. कोपरगाव हा अवर्षणप्रवण तालुका असून, या मतदारसंघात दारणा धरणातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. गोदावरी डावा व उजवा कालव्यांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावरच या भागातील शेतकरी पिके घेतात. नाशिक जिल्ह्यात दारणा व इतर धरणांच्या पाणलोटक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांतून बिगरसिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. या बिगरसिंचनाच्या आवर्तनातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, जेणेकरून पावसाअभावी वाळत चाललेल्या खरीप पिकांना जीवदान मिळू शकेल.
त्यामुळे भारनियमन त्वरित रद्द करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना द्यावेत, तसेच गोदावरी कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.