मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 11 डिसेंबर रोजी “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून, सध्या हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023पर्यंत खुला करण्यात येणार आहे. या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे.
यामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे. नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी 13 तास लागत होते; आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य झाले आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी झाला आहे.
दरम्यान, आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुसाट वेगावर कडक वॉच राहणार आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावर वाहनांचा स्पीड मोजणाऱ्या इंटरसेप्टरची संख्या वाढवली जाणार असून, यामुळे आता सुसाट गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांवर कडक नजर राहणार आहे.
समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता वेगवान वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तर समृद्धी महामार्गावर नियमांचं पालन करा, अन्यथा दंड भरा, असे आवाहन देखील वारंवार केले जात आहे.