बारामती – बारामती आगार लॉकडाऊनमुळे दि. 22 मार्चपासून गुरुवार (दि. 21) म्हणजेच दोन महिने पूर्णपणे बंद होते. शुक्रवार (दि. 22) पासून काही मार्गावर सेवा सुरू झाल्या आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांत बारामती व एमआयडीसी आगाराचे जवळपास 15 कोटींचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आगार प्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. त्यामुळे बारामती आगाराच्या लालपरीचे चाक लॉकडाऊनमुळे रूतले असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
बारामतीची बससेवा सुरू झाली असली; तरी नीरा व फलटण मार्ग वगळता उर्वरित मार्गांवर शटल सेवा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. एका बसमध्ये 20 प्रवाशांना घेऊन सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद फारच कमी आहे. जोपर्यंत एसटीची सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत शहरातील तीन आसनी रिक्षाचालकांचाही व्यवसाय सुरळीत होत नसल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे लवकर राज्यातील एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी होऊ लागली आहे.
बारामतीतून दररोज साधारणपणे 700 फेऱ्या होतात. वाहक व चालकांची संख्याही 500 पेक्षा अधिक आहे. तर दोन्ही आगारात मिळून 150 बस गाड्या आहेत. बारामती शहर व तालुक्याला रस्ते मार्गाने जोडणारे एसटी हे सर्वांत स्वस्त व सुरक्षित असे साधन आजही ग्रामीण भागात मानले जाते. बारामती-पुणे-बारामती विनावाहक विनाथांबा ही सर्वाधिक उत्पन्न देणारी सेवा आहे. मात्र, पुण्यात करोनाचा धुमाकूळ सुरू असल्याने पुण्याची बससेवा पूर्ववत केव्हा सुरू होणार, हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे बारामती आगाराला तोपर्यंत तरी नुकसान सोसावे लागणार हे नक्की.
“शिवशाही’ ठरणार पांढरा हत्ती?
लॉकडाऊन उठल्यानंतर एसटी सेवा सुरू झाली तरी शिवशाहीसारख्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवासी प्रवास करण्यास तयार होतील का, हा प्रश्नच आहे. कारण एसीमुळे करोनाचा अधिक प्रसार होत असल्याचे सिद्ध झाल्याने एसीबाबत नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यातच वातानुकूलित व प्रवासाचे अधिकचे दर यामुळे शिवशाही बसेसला प्रवासी मिळणार का, की या बसेस पांढरा हत्ती ठरणार हे पाहावे लागणार आहे.