नगर (प्रतिनिधी) – शहरातील सुमारे अंदाजित पाच लाख आबालवृद्ध नागरिकांच्या जन्म-मृत्यू दाखल्यांची मनपाच्या संगणकप्रणालीत नोंदच झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विवाह नोंदणी झाली नाही किंवा जन्म-मृत्यू दाखले गहाळ झाल्यास नागरिक हे दाखले मागण्यासाठी गेले असता त्यांचा कोणताच दस्तऐवज पालिकेजवळ नाही. त्यामुळे मनपाची संगणक प्रणाली काय काम करते? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
दरम्यान, या महत्वाच्या दस्तऐवजांची नोंद मनपाच्या संगणकप्रणालीतच नसल्याने अस्तित्वात असलेल्या मनपातील या दाखल्यांची मूळ कागदपत्रांच्या चक्क झिरमाळ्या झाल्या आहेत. तर काही उंदिर आणि घुशींच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ही कागदपत्रे आता इतिहासजमा होतात की काय? अशी धास्ती आता नागरिकांना पडली आहे. या दस्तऐवजांची तातडीने संगणकीय नोंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बाहेरगावावरून तसेच थेट बाहेरदेशातून आलेल्या नागरिकांना आपले दाखले काढण्यासाठी तासन्तास उन्हात थांबावे लागते. तरीही दाखले तातडीने मिळत नाहीत. महापालिकेने नागरिकांचा दाखले मिळविताना होणारा त्रास कमी करण्यासाठी जुन्या दस्तऐवजाचे संगणकीकरण करणे महत्वाचे बनले आहे. मनपाचे सर्वच विभाग ‘हायटेक’ होत असतानाच जन्म-मृत्यू दाखला नोंदणीचा विभाग पिछाडीवरच असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटली आहे.
क्षेत्रिय कार्यालयांसह महापालिकेच्या जन्म-मृत्यू कार्यालयात महिनोंमहिने खेटे मारूनही नागरिकांना दाखले मिळत नसल्याने, गेल्या कित्येक महिन्यांपासून जन्म-मृत्यू दाखल्यांची प्रक्रिया सर्वच स्तरातून मोठी टिकेची धनी ठरली. त्यातच महापालिकेचे ’नागरी सुविधा केंद्र’ म्हणजे असुविधांचीच केंद्रे बनले असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांना वेळेत जन्म-मृत्यू चे दाखले मिळण्यासाठी व एकाच कार्यालयावरील भार कमी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने, शहरातील पाच क्षेत्रिय परिमंडळनिहाय नागरी नोंदणी पध्दतीने (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम) या संगणकप्रणालीमध्ये जन्म-मृत्यू घटनांची नोंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.
साधारण दोन महिन्यांपूर्वी मनपाच्या एका जबाबदार अधिकार्याने या दस्तऐवजाचे लवकरच संगणकीकरण होणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. मनपातील सर्व दाखल्यांचे संगणकीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र, आता तब्बल दोन महिने उलटून गेले असून अद्यापही या दस्तऐवजांच्या संगणकीकरणाची कोणतीही हालचाल किंवा पूर्वतयारी मनपा स्तरावर दिसून आली नाही.
त्यामुळे त्या अधिकार्याने मारलेल्या लोणकढी थापेमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. या दस्तऐवजांची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सर्वत्र दाखल्याच्या पुरातन कागदांची शकले होऊन अस्ताव्यस्त पडली असून त्याचा अक्षरशः उकिरडा झाला आहे.