पुरंदर: पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक वागदरवाडी येथील माऊली मित्र मंडळाने येथील वनीकरणात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चातुन तयार केलेल्या कृत्रीम टाक्यांमध्ये दुचाकीवरुन पाणी आणुन टाकत आहेत. त्यामुळे तीव्र सुरू झालेल्या उन्हाळ्यात वनीकरणातील चिंकारा जातीच्या हरणांसह अन्य, ब-यांच वन्यप्राण्यांची तहान भागत आहे.
सध्या दिवसेंदिवस उ्न्हाची तीव्रता वाढत असुन पाण्याची टंचाई भासू लागली आहे. वनीकरण परिसरात वनविभागाच्या वतीने बांधलेल्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मनुष्यवस्तीकडे धाव घेत आहेत. काही वेळेस येथुन जवळच रेल्वे मार्ग तसेच रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वे व वाहनास धडकुन या मार्गावर हरणांचा मृत्युही झाला आहे. तसेच गावातील कुत्रे या हरणांना त्रास देतात. या सर्व बाबींचा विचार करुन वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये म्हणुन वागदरवाडी येथील माऊली मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातुन प्लॅस्टीक बॅलरच्या सहाय्याने वनपरिसरामध्ये चार ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार केले.
तसेच तयार केलेल्या पाणवठ्यामध्ये, दुचाकीवरुन पाणी आणुन हे सर्व पाणवठे भरण्यात आले. या विधायक कामामुळे सर्वञ या तरुणांचे कौतुक होत आहे. या पाणवठ्यांमुळे हरणे तसेच वनविभागातील पशु-पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हे कृत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी माऊली मित्र मंडळाचे, विश्वजीत पवार, संदीप पवार, मधुकर पवार, अजित शिंदे, दिपक पवार, शिवप्रसाद पवार,आदिंनी परिश्रम घेतले.