येरवडा – आगामी महापालिका निवडणुका आणि मार्च एंडिंग यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगले रस्ते आणि सोयी सुविधा पुरविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, त्यात डांबरीकरणासाठी लागणारी खडी वाहतूक करणारा ट्रक रस्ता खचल्याने रुतून बसला; त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट राहिले. ड्रेनेजच्या चेंबरमध्ये हा ट्रक अडकल्याने पाच वर्षात कोणत्या “दर्जाची’ कामे झाली हे येरवडा नागरिकांना पाहायला मिळाले.
येरवडा यशवंतनगर, भाटनगर येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येणार होते, त्यासाठी डांबराची खडी भरलेल्या ट्रक आणि मशिनरी सकाळपासून विमानतळ रस्त्यावर उभ्या होत्या. दुपारी त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याचे आदेश दिले गेले. मात्र, त्याठिकाणी जाण्याच्या रस्त्यावरच घोळ झाला आणि रस्ता खचून डांबरी खडीचा ट्रक चेंबरमध्ये अडकला. सायंकाळपर्यंत तो काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम कसे केले जाते, याचा नमुना नागरिकांना या प्रकारातून पहायला मिळाला. तर, काम कशा दर्जाचे झाले आहे, हे पाहण्याची जबाबदारी पालिकेच्या अधिकाऱ्यांची नाही का? प्रत्येक वर्षी तीच तीच कामे पुन्हा करावी का लागतात? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.