पुणे- पिशव्या, भांडी, बाकडे असल्या गोष्टी नागरिकांनी नगरसेवकांना मागू नयेत आणि त्यांनी दिल्या तरी त्या “भीक’ म्हणून घेऊ नयेत. कारण, तो सर्व पैसा नागरिकांचाच असतो. कोणत्याही वस्तूवर नगरसेवकांनी त्यांची स्वतःची नाव टाकू नयेत, असली “चीप पब्लिसिटी’ नागरिकांच्या पैशांवर नगरसेवकांनी करू नये, असे आवाहन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “नागरिकांचा जाहीरनामा’ तयार करण्यासाठी पुणेकर नागरिकांचा “अपेक्षा जागर मेळावा’ पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मनोहर मंगल कार्यालय एरंडवणे येथे पार पडला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना वेलणकर बोलत होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अशोक धिवरे होते. ते म्हणाले की, पक्षीय धेय धोरणाच्या विचारधारेपासून दूर राहूनच मतदान केले पाहिजे, माझ्या मताचा माणूस निवडून आला की झाले असा स्वार्थी विचार न करता तो नेता सर्व देशाच्या आणि लोककल्याणासाठी योग्य आहे का? हे पाहणे आणि त्यादृष्टीने मतदान करणे आवश्यक आहे.
शमसुद्दीन तांबोळी म्हणाले की, नागरिकांच्या जाहिरनाम्याने प्रभावी दबाव गटासारखे कायमस्वरूपी काम केले पाहिजे. हा दबाव गट निवडणुकीपुरता मर्यादित न राहता त्यानंतर ही अनेक शहर सोयी सुविधांसाठी या दबाव गटांचा उपयोग करता येईल. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सचिव मनीषा कोष्टी, पुणेकर नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, रवींद्र धारिया, शमसुद्दीन तांबोळी, विवेक वेलणकर, डॉ. नरेंद्र पटवर्धन, माजी पोलीस अधिकारी अशोक धिवरे आदी उपस्थीत होते.