रायगड – देशात एकमताची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. देशाच्या हितासाठी एकसंधतेचा विचार पुढे घेऊन जायचे आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
रायगड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, सहकार चळवळीत राज्याचे वेगळे स्थान आहे. देशाच्या सहकार चळवळीला महाराष्ट्राने एक वेगळी दिशा दिली आहे.
वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीला बळ दिले. त्यामुळे अनेक जिल्ह्यात बॅंक उभी राहिली. देशातील सहकारी बॅंक म्हणुन महाराष्ट्र बॅंक मोठी आहे. मी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली. सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या बॅंका चांगल्या आहेत. बॅंकेची थकीत रकमेची माहिती घेतली की बॅंकेची नाडी कळते. रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंक याचे थकीत कमी आहे, याचाच अर्थ बॅंक चांगली सुरू आहे.
राज्यात सहकार क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. यात सहकारी साखर कारखान्यांचे कौतुक होते, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. सत्ता येते-जाते, परंतु संस्था नीट चालवायला हव्यात. व्यक्तिगत लाभाचा विचार न करता बॅंक चालवायला हवी. राज्याचा आणि देशाच्या हिताचे प्रश्न आम्ही घेत असताना कोणते खाते आपल्याकडे याचा विचार करत नव्हतो, असेही शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंनाही लगाविला टोला –
मनोज जरांगे यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्यांच्याशी सुसंवाद केला. परंतू त्यांचे बोलणे काय झाले, याबाबत मला माहिती नाही. परंतू मनोज जरांगे यांनी सरकारला 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यावर आणखी काही दिवस वाढवून देण्यात आले.
या कालावधीत आरक्षण देण्याचे काम होईल, असा विश्वास त्यांना देण्यात आला होता. परंतू ते काम झालेले दिसत नाही. जे करणं शक्य नाही असा शब्द कधी देऊ नये. त्यानुसार कामही केले जात नसल्याचे सध्या तरी दिसते. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांचा यात काही दोष आहे असे मला दिसत नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी करत एकनाथ शिंदे यांना टोला लगाविला.