संगमनेर – राज्याच्या सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटत चालला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाशिवआघाडीची सत्ता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात कॉंग्रेसकडून मुख्य भूमिका बजावणारे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या श्रद्धा व सबुरीमुळे राज्यात चौथ्या क्रमांकावर गेलेला कॉंग्रेस पक्ष आता सत्ताधारी होणार आहे.
या सत्तेत थोरात यांना महत्वाचे मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेमुळे संगमनेरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर आता सत्ताकारणाने वेग घेतल्याचेही पहायला मिळत आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही पक्षांत सत्तेचे सूत्र निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु झाले. या सर्व प्रक्रीयेत बाळासाहेब थोरात केंद्रस्थानी आहेत.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत संगमनरेचा विकास खुंटला असून निधीच्या कमतरतेमुळे कामे ठप्प झाली. राज्यासह संगमनेरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहेत. तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले असून राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही का? अशी सध्याची स्थिती आहे.
मात्र आता कोणत्याही स्थितीत मंत्रिमंडळात संगमनेरला महत्वाचे स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रदेश कॉंग्रेसच्या शीर्षस्थानी संगमनेरचे नेतृत्व असल्याने नव्याने निर्माण होणाऱ्या “महाशिवआघाडी’ सरकारमध्ये संगमनेरचे स्थान अत्यंत महत्वाचे असणार आहे. त्यामुळे संगमनेरला नेमके काय मिळते, याविषयी संपूर्ण तालुक्यात अंदाज बांधले जावू लागले आहेत.