कर्जत – भिसेगावाकरिता भुयारी मार्ग करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी प्रजासत्ताक दिनापासून शहरातील टिळक चौकात उपोषण सुरू केले होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी उपोषणस्थळी भेट देत हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही तसेच पत्र उपोषणकर्ते कुळकर्णी यांना दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या रेल्वे मार्गावर रेल्वे गेट असल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना येजा करणे सोयीस्कर होते. मात्र येथे होणारे वाढते रेल्वे अपघात लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद केले. त्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांना ये जा करायची झाल्यास लांबचा वळसा घालत हायवेवरून भिसेगाव व कर्जतला ये-जा करावी लागते.
ही समस्या दूर करण्यासाठीच या बंद केलेल्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी रेल्वे रुळाखालून कर्जत – भिसेगावला जोडणारा भुयारी मार्ग बांधावा अशी मागणी गेली कित्येक वर्षांपासून नागरिक करीत आहेत. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने अखेर नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अमोघ कुळकर्णी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. आणि प्रजासत्ताक दिनापासून कर्जत शहरातील टिळक चौकात उपोषण सुरु केले. या उपोषणाला सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा दिला. यावेळी आमदार महेंद्र थोरेवे यांनी त्यांची भेट घेत, लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित केले आहे.