चऱ्होली – थंडी आता पूर्णपणे गायब झाली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माठांचे येथील बाजारात आगमन झाले आहे. मात्र, माठ बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भोसरीमध्ये लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली आहे. नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढणार असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांचा अंदाज आहे. सर्वसामान्य आणि गरिबांकडून उन्हाळ्यात माठाला सर्वाधिक मागणी असते. असे असले तरीही आता उच्चभ्रू नागरिकांकडूनही माठाला पसंती देण्यात येत आहे. अशा उच्चभ्रूकडून नक्षीकाम केलेल्या पांढऱ्या किंवा लाल माठाला अधिक पसंती असते.
यात चिनी मातीपासून तयार केलेल्या माठांचे प्रमाण जास्त असते. परराज्यातील विक्रेते अशा तयार माठांची विक्री करतात. असे माठ तयार करण्यासाठी कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या कुंभारबांधवांना या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. उच्चभ्रूसह अनेक जण आता ऑनलाइन खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे नक्षीकाम असलेले माठ आता ऑनलाइन मिळू लागले आहेत. परिणामी कुंभारबांधवांना याचा फटका बसत आहे.
माठ बनविणे परवडत नाही
मेहनत व खर्च पाहता माठ बनविणे परवडण्यासारखे नाही. यामुळेच माठांचे भाव दुपटीने वाढलेले आहेत. साधारणत: पौष महिन्यात (डिसेंबर, जानेवारी) या महिन्यात बनविलेल्या माठांमध्ये उन्हाळ्यात अत्यंत गार पाणी असते, असे व्यावसायिक सांगतात.
लाकूड, मातीचे दर वाढले
सद्य: स्थितीत 1500 ते 2500 रुपये मातीच्या एका ट्रॅक्टरसाठी, आठशे रुपयांत एक छोटा टेम्पो माती असे कच्च्या मालाचे दर आहेत. तयार केलेले माठ शेकण्यासाठी लागणारे लाकूड 10 ते 12 रुपये किलोप्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. माठ बनविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्याला ठराविक वेळ द्यावाच लागतो. त्यासाठी मेहनतही तशीच घ्यावी लागते.
माठ खरेदी करताना ग्राहक काहीही भाव करतात. सांगितलेल्या दरापेक्षा निम्म्या दरात माठ खरेदी करण्याची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. मात्र, पर्याय नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी हा पारंपरिक उद्योग आम्हाला करावाच लागत आहे. त्यातच आज काल गरिबांच्या घरातही इलेक्ट्रॉनिक फ्रिज आढळून येतो. त्यामुळे साहजिकच आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
– बिश्वासलाल, व्यावसायिक.