कोलंबो: श्रीलंकेच्या अध्यक्षपदी गोटाबाया राजपक्षे यांची निवड झाल्यानंतर त्या देशात आता संसदेच्या मध्यावधी निवडणुकांची शक्यता बळावली आहे. सत्तारूढ युनायटेड नॅशनल पार्टीनेच हे संकेत दिले आहेत. श्रीलंकेच्या नवीन अध्यक्षांनी आज शपथ घेतल्यानंतर लगेचच देशात मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. निर्धारीत मुदतीनुसार श्रीलंकेतील संसदेची मुदत ऑगस्ट 2020 ला संपत आहे. त्याच्या आधीच संसद बरखास्त करण्याचा विद्यमान सरकारचा प्रयत्न असणार आहे.
राजपक्षे यांच्या निवडीनंतर पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचे आसन डळमळीत झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या पक्षाला या अध्यक्षीय निवडणुकीत अपेक्षित मते मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे ही आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे. या पराभवामुळे अनेक मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यात अर्थमंत्री मंगला समरवीरा यांचाहीं समावेश आहे.