पुणे –निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील पॉलिहाउस व शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. यात सुमारे 751 शेतकऱ्यांचे 206.55 हेक्टर्सवर नुकसान झाल्याचे पंचनाम्याच्या अंतिम अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतच्या नजर अंदाजाद्वारे नुकसानीची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने यापूर्वी घेतली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील 87 गावांतील 317 शेतकऱ्यांचे सुमारे 100.53 हेक्टर्सवरील पॉलिहाउस व शेडनेटचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात पॉलिहाउस व शेडनेटमध्ये फुलांचे, फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फुलांचे सर्वाधिक उत्पादन मावळात घेतले जाते. याशिवाय मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर तालुक्यांतील अनेक भागातही फुले व फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पॉलिहाउसच्या 648 शेतकऱ्यांचे 188.87 हेक्टर तर 103 शेतकऱ्यांचे 17.68 हेक्टरवर शेडनेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये मावळ तालुक्यात सर्वाधिक नुकसान हे फूल उत्पादकांचे झाले असल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय कषी विभागाने आयोजित केलेल्या वेबनारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी संवाद साधताना माजी आमदार बाळा बेगडे यांनी जिल्ह्यातील नुकसानीकडे त्यांचे लक्ष वेधले होते.