महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी पुण्यामध्ये घेतलेल्या सभेमध्ये केवळ विविध विषयांवर स्पष्टीकरण देणे हाच त्यांचा उद्देश होता, हे सहजपणे लक्षात येते. राज ठाकरे यांनी पाडव्याला आणि त्यानंतर घेतलेल्या काही सभांमध्ये जे विविध विषय मांडले होते त्या विषयाला प्रत्युत्तर देण्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जी टीका केली होती त्याला उत्तर देण्यासाठीसुद्धा ही पुण्यातील सभा महत्त्वाची मानण्यात येत होती.
राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या पुण्यातील सभेत अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती; पण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ट्विट करून अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यामुळे हा दौरा का स्थगित केला, त्याची माहिती देण्याचेही काम या सभेमध्ये राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांनी आतापर्यंत कोणतेच आंदोलन पूर्णत्वास नेले नाही, एखादा विषय हाती घ्यायचा आणि तो मधेच सोडून द्यायचा अशा प्रकारची टीका त्यांच्यावर करण्यात आली असल्याने या टीकेलाही त्यांनी या सभेमध्ये उत्तर दिले आणि कोणती आंदोलने आम्ही शेवटपर्यंत पोहोचवली आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून दिला याची जंत्री सुद्धा त्यांनी या सभेमध्ये मांडली.
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये राज ठाकरे यांच्या ज्या विविध सभा झाल्या त्या सभांमध्ये त्यांचा जो जोश होता किंवा ते ठामपणे मुद्दे मांडण्याची जी प्रक्रिया होती त्याचा काही प्रमाणात अभाव या पुण्यातील सभेमध्ये जाणवला. कोणत्याही विषयाला संपूर्ण उत्तर न देता त्यांनी त्या विषयाला स्पर्श करण्याचे काम फक्त केले. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांनी जी सभा घेतली होती त्या सभेत केलेल्या वैयक्तिक टीकेला राज ठाकरे तेवढ्याच परखड शब्दात उत्तर देतील अशी आशा होती. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यापलीकडे राज ठाकरे यांनी फारसे महत्त्व दिले नाही. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर असो किंवा औरंगाबाद मध्ये येऊन एमआयएमच्या नेत्याने औरंगजेबाच्या कबरीला भेट देण्याचा विषय असो या विषयाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्याचे काम मात्र राज ठाकरे यांनी केले.
मशिदीवरील भोंगा वाजवण्याचे काम थांबवण्याची कायदेशीर विनंती करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे आणि दुसरीकडे मराठा साम्राजाचा शत्रू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवणाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही, हा फरक दाखवण्याचे काम निश्चितपणे राज ठाकरे यांच्या या सभेने केले आहे. ठरल्याप्रमाणे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा झाला असता, तर ती सर्वात मोठी बातमी ठरली असती आणि हा दौरा रद्द झाल्याने राज ठाकरे यांच्याबाबत काही तर्कवितर्क सुरू झाल्याने त्याबाबत स्पष्टीकरण देणे, हाही या सभेचा उद्देश होता. राज ठाकरे यांना अयोध्येमध्ये पाय ठेवू दिले जाणार नाही, अशा प्रकारची घोषणा भाजपचे नेते खासदार ब्रिजभूषण यांनी केल्यानंतर हा विषय पेटला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, असे ब्रिजभूषण यांनी म्हटले होते.
अट्टाहास करून राज ठाकरे अयोध्येला गेले असते, तर त्यांच्यावर, त्यांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना विनाकारण निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोर्टाची वारी करायला लावली असती, म्हणून आपण हा दौरा रद्द केला आहे, असे स्पष्टीकरणही यावेळी राज ठाकरे यांनी दिले आहे. अर्थात, एक जूनला त्यांचे एक ऑपरेशन होणार आहे. हेसुद्धा एक वैद्यकीय कारण त्यांनी दिले असले, तरी मी हा दौरा करू नये म्हणून मुद्दामहून एखादा प्लॅन आखण्यात आल्याची शंका राज ठाकरे यांनी या सभेमध्ये व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा गेल्या महिन्यामध्ये मशिदीवरील भोंगे बंद करण्याबाबत आंदोलन करण्याची घोषणा केली त्यानंतर सरकारी कारवाईने असेल किंवा काही इतर कारणाने असू देत मशिदीवरील सकाळचे भोंगे बंद झाले आहेत, हे वास्तवही त्यांनी दाखवून दिले आहे. या सभेतील स्पष्टीकरणामुळे कोणाचे समाधान झाले किंवा कोणाला तो विषय पटला हा संशोधनाचा विषय असला तरी यातूनही नवीन तर्कवितर्क आणि वाद-विवाद निर्माण होणे अपरिहार्य आहे.
राणा दाम्पत्यावर केलेल्या टीकेमुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण राणा दाम्पत्याने राज ठाकरे यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांमध्ये होणार असल्याने सर्वच प्रमुख पक्षाच्या नेत्यांना आता अशा प्रकारच्या सभांच्या माध्यमातून आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे. राज ठाकरे यांच्या अगोदरच्या सभेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यामध्ये ही सभा घेऊन विविध प्रकारचे स्पष्टीकरण देण्याचे काम केले आहे.
आगामी कालावधीमध्ये सुद्धा उत्तर-प्रत्युत्तर-स्पष्टीकरण आणि पुन्हा आरोप-प्रत्यारोप ही साखळी चालूच राहणार आहे, हे उघड आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा कॉंग्रेस यांनी आतापर्यंत या साखळीचा भाग होणे बाजूला ठेवले असले, तरी आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनासुद्धा येत्या काही कालावधीमध्ये अशा प्रक्रियेत सहभाग घेणे क्रमप्राप्त ठरेल, अशी एकंदरीत लक्षणे दिसत आहेत. अर्थात कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असो त्याने या सभेच्या निमित्ताने उपस्थित केलेल्या एखाद्या योग्य मुद्द्याला उत्तर देण्याचे नेहमीच टाळले जाते आणि या सभेतील एखाद्या वादग्रस्त विषयाला महत्त्व देऊन त्या सभेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, हेच आजपर्यंत दिसून आले आहे आणि यापुढेसुद्धा ते तसेच चालू राहणार आहे.
राज ठाकरे यांनी या सभेत म्हटल्याप्रमाणे, सर्वसामान्य जनतेला या सर्व विषयांचे गांभीर्य कळत नाही तोपर्यंत प्रत्येक सभेला उपस्थित राहून टाळ्या वाजवण्याचे काम करणे एवढेच जनतेच्या हातात राहते, असेच आज तरी दिसत आहे. त्यामुळे विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय चित्र पाहता आगामी कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा जनतेला ऐकाव्या लागणार आहेत. विविध नेत्यांनी त्यांच्या सभेमध्ये केलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देणे एवढेच राजकारण आता या राजकीय सभांमध्ये केले जाणार आहे, हे उघड आहे.