मुंबई – मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदासंघावरून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हा वाद टोकाला गेला आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा थेट हल्लाबोल रामदास कदमांनी गजानन कीर्तिकरांवर केला होता. याला गजानन कीर्तिकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली आहे. यामुळे शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Shinde Group)
रामदास कदम म्हणाले होते की,गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात (Thackeray Group) आहे. फक्त लोकसभेचा (Loksabha) उमेदवारी अर्ज भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचे कारण नाही. पण, एकाच कार्यालयात मुलगा आणि वडील बसतात. काय करताय हे सर्व जग पाहत आहे. मुलगा ठाकरे गटातून, तर तुम्ही शिंदे गटातून अर्ज दाखल कराल. नंतर मुलाला बिनविरोध निवडून द्यायचे, असे कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, ही विनंती आहे, असे कदमांनी म्हटले होते.
यावर एक परिपत्रक काढत गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना लक्ष्य केले आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले, रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे.
1990 साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले, असे प्रत्युत्तर दिले.