कराड – महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यानच्या रस्त्यावर रविवार दि. 30 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास उंडाळे (ता. कराड) येथील अमित आनंदराव चव्हाण (रा. उंडाळे) या युवकाचे कार व दुचाकीवरून आलेल्या टोळीने अपहरण केले होते. कराड ग्रामीण पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून तपास करून दहा संशयितांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी अमित चव्हाण यांचा भाऊ नितीन आनंदराव चव्हाण यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंदार भीमराव पाटील (वय 23, रा. निगवे ता. करवीर, जि. कोल्हापूर), श्रेणिक अशोक पाटील (वय 25), धैर्यशील राजाराम पाटील (वय 29, दोघेही रा. कामेरी ता. वाळवा, जि. सांगली), साहिल कादिर शेख (वय 21, रा. बावडा, जि. कोल्हापूर), ओंकार पांडुरंग रावळ (वय 23, रा. नगवे दुमाला ता. करवीर, जि. कोल्हापूर), अक्षय शेखर बागडे (वय 26), रोहन विजय गायकवाड (वय 23), मयूर प्रशांत गवळी (वय 24), विकास नरसु वेटाळे (वय 24) व श्रीधर वसंत पाटील (वय 25, सर्व रा. कसबा बावडा, जि. कोल्हापूर) या संशयितांना पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
अमित चव्हाण क्रीडा साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करत असून त्यास क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. या व्यवसायामध्ये नुकसान झाल्याने तो अनेक लोकांचे पैसे देणे आहे. रविवारी दि. 30 रोजी अमित महारुगडेवाडी येथे क्रिकेटच्या सामन्यासाठी संघ घेऊन गेला होता. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास महारुगडेवाडी येथील शशी तोडकर याने फोन करून नितीन चव्हाण यांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही लोकांनी अमितला जबरदस्तीने गाडीतून घेऊन गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर उंडाळे येथील प्रज्वल पाटील यांनीही नितीन चव्हाण यांना हेच सांगितले.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सौ. दीपज्योती पाटील यांनी मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेतला. उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक संशयितांच्या मागावर पाठवण्यात आले. या पथकाने कोल्हापूर येथून 8 जणांना, तर कामेरी येथून दोघांना रात्री ताब्यात घेऊन अटक केली. पोलीस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील तपास करत आहेत.