पुणे – राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. अनेक तरुण बेरोजगारीस त्रस्त होऊन सध्या आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागातील प्रलंबित पदभरती तातडीने करावी, अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी निवड समिती अध्यक्षांकडे केली. त्यावर भरती लवकरच पुर्ण करण्याचे आश्वासन युवासेनाला देण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट “ब’ या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. 2019 मध्ये ही जाहिरात प्रकाशित झाली असून 15 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. लाखो तरुणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अडीच वर्षे पूर्ण झाले असून देखील अद्याप या पदाची परीक्षा झालेली नाही. 11 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यशासनाने या संबंधित शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
यानुसार राज्यस्तरीय निवड समिती मध्ये काही बदल केले आहेत. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत गुणाले यांची भेट घेऊन तातडीने प्रलंबित पद भरती पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले.
राज्यभरात लाखो पदवीधारक तरुण या पद भरतीची वाट पाहत असताना फक्त प्रशासकीय दिरंगाई या तरुणांना मानसिकरित्या खचवण्याचं काम करत आहे. त्यामुळे ही पद भरती तातडीने करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येणार आहे. गुणाले यांना विधी व न्याय विभागाचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेण्याबाबतविनंती केली असल्याचे यादव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी न खचता अभ्यास करावा.परीक्षा लवकरात लवकर होईल यासाठी युवासेना सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळास स्पष्ट केले.
भरती प्रकरण हे न्यायालयाने दिलेल्या आरक्षणा बाबतच्या निकाला नंतर विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहे. संबंधित विभागाचा अहवाल येताच तातडीने याबाबतची पूढील कार्यवाही पूर्ण करणार असून परीक्षा लवकरचं होतील, अशी ग्वाहीही हनुमंत गुणाले यांनी दिली.