पुणे – कारने धडक दिल्यामुळे मृत्यू झालेल्या 16 महिन्याच्या मुलीच्या आई-वडिलांना 2 लाख 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये यावर शिक्कामोर्तब झाला. ऍड. शशिकांत बागमार, ऍड. अतुल लगड आणि ऍड. निनाद बागमार यांनी लहान मुलीच्या अपघाताच्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई मिळू शकते, अशी बाजू मांडत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
नगमा मोहम्मद शफी रेहमानी ही आई-वडिलांसोबत आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी साईनाथनगर, वडगावशेरी येथे रस्त्याने पायी चालली होती. त्यावेळी कारने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. त्याबाबत चंदननगर पोलीस स्टेशनने कारचे चालक, मालक आणि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात डी.ए.आर (डिटेल एक्सीडेंट रिपोर्ट) अन्वये नुकसान भरपाई मिळण्याबाबत अहवाल पाठविला होता. मुलीचे वडिल हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून, त्यांना न्यायालयीन कामकाज, डी.ए.आरबाबत फारसे कळत नव्हते. त्यांनी ऍड. शशिकांत बागमार, ऍड. अतुल लगड आणि ऍड. निनाद बागमार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी अपघातात मृत्यू झालेल्या 16 महिन्याच्या मुलीलाही नुकसान भरपाई मिळू शकते, असे ऍड. शशिकांत बागमार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
हे प्रकरण लोकअदालतमध्ये वर्ग करण्यात आले. तेथे मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य पी.आर. अष्टुरकर, ऍड. अतुल गुंजाळ आणि ऍड. दातार यांच्या पॅनेलहे हा दावा निकाली काढला. विमा कंपनीच्या वतीने ऍड. जयश्री वाकचौरे यांनी काम पाहिले. कोणताही साक्षी, पुरावा न नोंदविता लोकअदालतमध्ये दाव्याचा त्वरित निकाल लागला. नुकसान भरपाई मिळाल्याने मुलीची आई अबेदा मोहम्मद शफी रेहमानी यांनी न्यायालय आणि वकिलांचे आभार मानले.