लोणी काळभोर (पुणे) – विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या सत्र परीक्षा घेण्यासंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निकालात विद्यापीठ परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असे म्हटले आहे. या निर्णयामुळे विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार आहेत. या निर्णयाचा महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या पेरा (प्रिमीयंट एज्युकेशन ऍन्ड रिसर्च असोसिएशन) या संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन खासगी विद्यापीठांनी ऑनलाइन शिक्षण प्रभावी कसे करता येईल याची काळजी घेतली आहे. या विद्यापीठांमध्ये सर्वच विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांसाठी व्हर्च्युअल लॅब, क्लाऊड लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने आतापर्यंत सर्व विद्याशाखांच्या सर्व सत्रांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या आहेत. तसेच उच्च प्रतीच्या मूल्यांकन प्रणाली स्पॉटवेअरचा वापर करून सर्व विद्याशाखांचे निकाल ही वेळेवर जाहीर केले जाणार आहेत. या अद्यावत यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेप्रमाणे पूर्ण होतील, असा विश्वास प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केला आहे.