नवी दिल्ली: जगातील अनेक देशांप्रमाणे करोना संकटाशी झुंजणाऱ्या भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. करोनामुक्त झालेल्या देशातील बाधितांची संख्या 10 लाखांच्या घरात पोहचली आहे. करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 64.51 टक्के इतके आहे.
देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 35 हजार 286 रूग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सलग सहाव्या दिवशी 30 हजारांहून अधिक रूग्ण बरे होण्याची सकारात्मक घडामोड घडली. देशातील करोनाबाधितांच्या मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. तो दर (2.23 टक्के) 1 एप्रिलपासून सर्वांत कमी ठरला आहे.
देशात करोना संसर्गाने आणखी 768 बाधितांचा बळी घेतला. त्यामुळे देशातील करोनाबळींची संख्या 35 हजारांजवळ पोहचली आहे. दरम्यान, देशातील बाधितांमध्ये आणखी 48 हजार 513 संख्येची भर पडली. त्यामुळे देशात सलग सातव्या दिवशी 45 हजारांहून अधिक बाधितांची भर पडली.