केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली : गेल्या एका आठवड्यात देशात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली होती. मात्र आता हा कालावधी 7.5 दिवस झाला आहे. देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी 3.4 दिवसांतच रुग्णांची संख्या दुपटीने वाढत होती, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले.
18 – 19 एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील सरासरी कालावधीपेक्षा अधिक सुधारणा आढळली आहे, असे आरोग्य व कुटुंब व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दैनंदिन वार्तालापामध्ये सांगितले.
ज्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 20 दिवसांपेक्षा कमी असलेली राज्ये दिल्ली (8.5 दिवस), कर्नाटक (9.2 दिवस), तेलंगण (9.4 दिवस), आंध्रप्रदेश (10.6 दिवस), जम्मू काश्मीर (11.5 दिवस), पंजाब (13.1 दिवस), छत्तीसगढ (13.3 दिवस), तामिळनाडू (14 दिवस) आणि बिहार (16.4 दिवस) आहे.
ज्या राज्यांमधील रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 20 ते 30 दिवसांदरम्यान आहे, त्यामध्ये अंदमान-निकोबार (20.1 दिवस), हरियाणा (21 दिवस), हिमाचल प्रदेश (24.5 दिवस), चंदिगड (25.4 दिवस), आसाम (25.8 दिवस), उत्तराखंड आणि लडाख ( प्रत्येकी 26.6 दिवस) या राज्यांचा समावेश होतो आहे. तर ओडिशा आणि केरळ या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा वेग 30 दिवसांपेक्षा अधिक आहे. या राज्यांचा वेग अनुक्रमे 39.8 आणि 72.2 दिवस आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
पुडुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडगु व्यतिरिक्त उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातही गेल्या 28 दिवसांत करोनाच्या संसर्ग झालेल्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. देशभरातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच गोव्यातील सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिथे अद्याप नवीन रुग्ण सापडलेला नाही, असेही ते म्हणाले.