नवी दिल्ली -संपूर्ण जगाला ग्रासलेल्या करोना संकटाशी झुंजत असणाऱ्या भारताने बुधवारी नकोसा टप्पा ओलांडला. देशातील करोनाबाधितांची संख्या आता 3 कोटींवर गेली आहे.
देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 50 हजार 848 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 28 हजार 709 इतकी झाली आहे. मागील वर्षी 19 डिसेंबरला देशातील बाधित संख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला.
त्यानंतर 136 दिवसांनी म्हणजे 4 मे यादिवशी ती संख्या 2 कोटींवर गेली. त्यामध्ये आणखी 1 कोटीची भर अवघ्या 50 दिवसांत पडली. अर्थात, मागील काही दिवसांपासून नव्या बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याने देशाला दिलासा मिळाला आहे.
संबंधित 24 तासांत देशभरात आणखी 1 हजार 358 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनामृतांची संख्या 3 लाख 90 हजार 660 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 6 लाख 43 हजार 194 वर पोहचली आहे. ते प्रमाण एकूण बाधितांच्या 2.14 टक्के इतके आहे. बाधित बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.56 टक्के नोंदले गेले आहे.