सविंदणे – दोन महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शिरूर-नारायणगाव रस्त्यावरील कवठे येमाई येथील काळूबाई नगर येथे अर्धवट स्थितीमध्ये रस्त्याचे काम राहिल्याने या रस्त्याच्या लगत असणाऱ्या संतोष इचके यांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. ठेकेदाराने त्या ठिकाणी रस्त्यालगत व घराजवळ दोन महिन्यापासून मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. त्या ठिकाणी बॅरीगेट व इतर कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने या खड्डयातील पाण्यात पडून श्रेया इचके या दोन वर्षीय चिमुकलीचा नाहक बळी गेला.
या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे होत असून ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. अनेक छोटे-मोठे अपघात रोजच होत आहे. या रस्त्यावरून भीमाशंकर साखर कारखाना व पराग साखर कारखान्यासाठी मोठया प्रमाणात वाहनातून आणि ट्रॅकटरद्वारे उसाची वाहतूक मोठया प्रमाणावर होत आहे. अनेकदा ऊसाची वाहने पलटी होऊन अपघात होताना दिसत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे. याकडे निगरगठ्ठ ठेकेदार व या रस्त्यासाठी नियंत्रण असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोळेझाक करत असून येथे फिरकतही नाही.
रिल्फेक्टर, बॅरीकेट यांचा काम चालू असताना वापर होत नाही. नक्की बांधकाम विभागाचे अधिकारी करतात तरी काय? हा मोठा प्रश्न वाहन चालकांना व परिसरातील नागरिकांना पडला आहे
मुलीच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदाराबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे. दोन महिन्यापासून या खड्यांविषयी लेखी पत्रव्यवहार करूनही कुठलेही काम न केल्याने चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. या रस्त्याच्या कामांमध्ये एक लेअर गायब केला गेला असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये होत आहे. या रस्त्याच्या निकृष्ठ कामासंबधी चौकशी करण्याची लेखी मागणी केली आहे.
– रमेश वागदरे (सामाजिक कार्यकर्ते)