नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठी लोकशाही या नात्याने भारताची संसद आणि विधिमंडळांनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला पाहिजे असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
द महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठातून राजकीय नेतृत्व आणि प्रशासनातील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना संसदीय लोकशाही बळकट करणे आणि सुशासन प्रक्रिया अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
देशात 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातली असल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी विकासाला गती देण्यासाठी आणि पुनरुज्जीवित नवभारताची उभारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणातील युवा लोकसंख्येच्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याचे आवाहन केले. आगामी काळात भारताला नवी उंची गाठण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्रभावी नेतृत्व ही अपरिहार्य गरज असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
नायडू यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या मातृभाषेत पारंगत होण्याचे, आपल्या गुरूंचा आणि पालकांचा आदर करण्याचे आणि इतरांबद्दल, विशेषतः गरजू आणि असुरक्षित लोकांबद्दल नेहमीच सहानुभूती बाळगण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले.