औरंगाबाद – औरंगाबाद येथील बजाज ऑटोमधील 250 कामगारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर काही कामगारांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कारखान्यात आणि कारखान्याबाहेर काळजी घेऊन काम चालू ठेवण्याची गरज असल्याचे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हटले आहे.
ते म्हणाले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत काम फारसे झाले नाही. मात्र, कामगारांच्या पगारात कपात करण्यात आलेली नाही. मात्र जर आता काम थांबवावे लागले तर कामगारांच्या पगारात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. ते म्हणाले की, औरंगाबाद शहरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. शहरांमध्ये सर्व नागरिकांनी काळजी घेतली तर संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
शहरापेक्षा कारखान्यात संसर्ग होऊ नये म्हणून अधिक काळजी घेण्यात येते. या ठिकाणी गर्दी होत नाही. त्यामुळे काम थांबवणे योग्य होणार नाही, असे त्यांनी सूचित केले. बजाज प्रकल्पातील कामगार संघटनांनी काही दिवस काम थांबविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचा या कामगार संघटनानी आज पुनरूच्चार केला
राजीव बजाज यांनी फारशी गरज नसताना देशभरात कडक लॉकडाऊन केल्यामुळे देशातील औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याचे अगोदर सांगितले आहे.