मुंबई – स्वातंत्रय प्राप्त होऊन 75 वर्षे होत आहेत, तरीदेखील आपल्या देशात अनेक ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत. हे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असून त्यासाठी एक समग्र आढावा घेण्याची गरज आह, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
जुहू विले पार्ले मुंबई येथील कानबाई विद्याधाम या संस्थेने सुरु केलेल्या अधिया विधी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोश्यारी म्हणाले, विधी व न्याय हा अतिशय व्यापक विषय आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांपलीकडे जाऊन सर्वंकष अध्ययन केले पाहिजे. न्यायशास्त्र व तर्कशास्त्र या विषयांवर प्राचीन काळात भारतात विपुल चिंतन झाले असून विधी विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या न्यायशास्त्राचादेखील अभ्यास केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आपल्या देशात इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी लोकांना आहे. त्यामुळे विधी शिक्षण प्रादेशिक भाषेत उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विधी विद्यार्थ्यांनी व वकिलांनी मातृभाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला कायदे समजणे शक्य होईल, असे राज्यपालांनी सांगितले.