मुंबई – महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. ते तब्बल सहा दिवस राजभवनात मुक्कामी असणार आहेत. नुकताच सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोश्यारींच्या भूमिकेवर न्यायलयाने कडक ताशेरे ओढले. आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. त्यामुळे कोश्यारींचा मुंबई दौरा चर्चेत आला आहे.
महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सर्वाधिक वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेले राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची ओळख आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर कोश्यारींनी राज्यपाल पदातून मुक्त करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती.
मात्र त्याआधी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताना त्यांनी घेतलेले निर्णय हे घटनाबाह्य असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालने ओढले. 11 मे रोजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे सरकार कायम राहाणार असल्याचे या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.
कोश्यारी राज्यपाल असताना त्यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. असे आदेश देण्याचा राज्यपालांना अधिकार नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने कोश्यारींना फटकारले. राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांच्या पलिकडे जाऊन घेतलेला तो निर्णय असल्याचे कोर्टाने म्हटले. तसेच एकनाथ शिंदे यांना सत्तास्थापनेचे दिलेले निमंत्रणही कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे निकालात स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कोश्यारी प्रथमच राजभवनात आले आहेत. राज्यपाल रमेश बैस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ते सहा दिवसांच्या मुक्कामात कोणते धडे देणार याची राजकीय वर्तूळात चर्चा रंगली आहे. कारण 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना कोर्टाने दिले आहेत. 17 ते 20 मे दरम्यान कोश्यारी मुंबईत असणार आहेत.