मुंबई – एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय हा आपल्या देशाचा समृद्ध वारसा आहे अशा शब्दात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय चित्रपट संग्रहालयाविषयी गौरवोद्गार काढले. ठाकूर यांनी गुरूवारी(दि.21) मुंबईतील एनएमआयसी अर्थात भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला त्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
सिनेमा ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे जी जगभरातील लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करते, असे ते म्हणाले. मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांनी जगामध्ये भारताची ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयातील विविध विभागांना भेट दिली तर गेल्या शंभर वर्षातील चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि तंत्रज्ञानात झालेले बदल पाहायला मिळतील असे सांगत ठाकूर यांनी मुंबईला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या संग्रहालयाला भेट द्यावी असे आवाहन यावेळी केले.
विशेषत: भारतीय चित्रपटांमध्ये स्वारस्य असलेल्यांनी राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी, असेही ते म्हणाले. मुंबईत असताना एनएमआयसीला भेट दिली नाही तर मुंबईची भेट अपूर्ण राहील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
एकीकडे, आठ एकरवर पसरलेल्या गुलशन महल या इमारतीत विविध आकाराच्या आठ खोल्यांत असलेले प्रदर्शन, मूक चित्रपटांपासून ते नव्या चित्रपटांपर्यंतच्या इतिहासाचा वेध घेते तर, दुसरीकडे नव्या संग्रहालय इमारतीत बहुतांश संवादात्मक प्रदर्शन आहे. चित्रपटात वापरलेल्या वस्तू, जुनी उपकरणे, पोस्टर्स, महत्वाच्या चित्रपटांच्या प्रति, प्रसिद्धी पत्रके, ध्वनीफिती, ट्रेलर्स, ट्रान्सपरन्सी, जुनी चित्रपट मासिके, चित्रपट निर्मिती आणि वितरणाविषयीची माहिती व्यवस्थितपणे प्रदर्शित करण्यात आली आहे, ज्यात भारतीय चित्रपटांचा इतिहास क्रमवार प्रदर्शित करण्यात आला आहे. फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक रवींद्र भाकर यांनी या संग्रहालयाची साधारण रुपरेषा सांगितली.
इथे घालवलेल्या तीन-चार तासांत संग्रहालय तुम्हाला 100 वर्षे जुन्या इतिहासात घेऊन जाईल, जेव्हा कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञान किंवा उपकरणांशिवाय चित्रपट बनवला जात होता, असे ते म्हणाले. हे संग्रहालय प्रेक्षकांना, चित्रपट पहिल्यांदा बनला होता त्या काळात म्हणजे 100 वर्षांआधी ते आतापर्यंतचा प्रदीर्घ पट उलगडून दाखवते, असे ते म्हणाले. जगातील सर्वाधिक चित्रपट भारतात बनवले जातात असेही त्यांनी सांगितले.
आपल्या या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एनएमआयसी परिसरात चाफ्याचे रोप लावले. तसेच चित्रपट विभाग, एनएमआयसी, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसेच एनएफडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. आगामी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (एमआयएफएफ) तयारीबाबतही केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीत चर्चा केली.